झाडाचे आत्मकथन या विषयावर निबंध लेखन करा?
Answers
Explanation:
एका संध्याकाळी बागेत फिरायला गेलो असताना अचानक मागून आवाज ऐकू आला. बागेत फारसे कुणी नसल्याने तो आवाज स्पष्ट ऐकू येत होता. कुणीतरी मला बोलावत होतं,”इकडे ये, ऐक जरा माझं“. मागे वळून बघितल्यावर समजलं कि त्या बागेत असणारं झाड मला बोलावत होतं. त्याला माझ्याशी बोलायचं होतं. मी जवळ जाताच ते माझ्याशी गप्पा मारायला लागलं. म्हणालं, “अरे , बरेच दिवसांपासून मला कोणाशीतरी बोलायचं होतं, मनातलं सगळं सांगायचं होतं, पण कोणालाच माझा आवाज ऐकू येई ना, आज तू माझा आवाज ऐकलास आता मला माझं मनोगत तुला सांगता येईल.” मी हि शांतपणे त्याच बोलणं ऐकू लागलो.
“मी झाड आहे. एक झाड. माझे महत्व तर सगळ्यांनाच माहित आहे पण तरीही आज मला काही गोष्टी सांगाव्याश्या वाटतायत. मला माझे अस्तित्व आहे. मला माहितीय माझं सगळं आयुष्य माणसासाठी आहे. माझ्या प्रत्त्येक अवयवाचा उपयोग माणसांना होतो. माझी मूळ, खोड, फांद्या, पाने, फुले, फळे अगदी सगळ्याचाच. झाडे तुम्हाला सावली देतात, फळे देतात, झाडांची फुले तुमच्या घराची, समारंभाची शोभा वाढवतात. अगदी देव्हाऱ्यातल्या देवालाही फुलांचा मोह आवरत नाही. झाडाच्या प्रत्येक अवयवाचा तुमच्या दैनंदिन जीवनात वापर करता येतो. जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर थांबविण्यासाठी या आमचा उपयोग होतो. आम्ही ५०० गॅलन वाफ बाहेर टाकत असतो त्यामुळे उन्हाळ्यातही आमच्याखाली जास्त गारवा असतो.
कोकणात असे समजले जाते कि, नारळ कधी कोणाच्या डोक्यावर पडत नाही. म्हणजे आम्हाला एवढी जाणीव आहे कि, आमचे सर्वच आयुष्य आम्ही माणसांसाठी, या जीवसृष्टीसाठी बहाल केलंय. मोकळ्या माळरानावर चरणारी गुरे, आमच्या फांद्यांवर आपले छोटेसे घरटे बांधणारे पक्षी, पारंब्यांना लटकून तुम्हाला वाकुल्या दाखवणारी माकडे, हे सगळं बघितलं कि आम्हाला खूप आनंद होतो.
आमच्यामुळे आम्ही कोणालातरी सुखी करतोय हि भावनाच मुळी अद्वितीय आहे. घराच्या बागेत असणाऱ्या झाडांशी जेव्हा तुम्ही प्रेमाने गप्पा मारता तेव्हा तीच झाडे त्या आनंदाच्या बदल्यात तुम्हाला स्वच्छ हवा, फळे, फुले भरभरून देतात. माणसाच्या तीनही मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा या झाडांच्या अस्तित्वानेच पूर्ण होतात.
आज माणूस हे सगळं विसरत चाललाय. आणि म्हणूनच आज मला बोलावं लागतंय. ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतांच्या ओव्यांमध्ये अग्रस्थानी असलेले वृक्ष आज पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे एका क्षणात कोलमडून पडत आहेत. आणि यामुळेच जगाचे चक्र बिघडले आहे. ऋतुचक्र बदलत चाललंय. वेळी अवेळी येणारा पाऊस, अचानक येणारी थंडीची लाट आणि वाढत चाललेला उन्हाळा हे सर्व ऋतुबदल झाडांच्या होणाऱ्या कत्तलीमुळेच आहेत. २००५ साली आलेला महापूर, २००४ सालची त्सुनामी, नुकतेच चेन्नई ला धडकले वादळ झाडे तोडीचाच एक छोटासा परिणाम आहे.
ऑक्सिजन चे घटत चाललेले प्रमाण, ओझोन ची कमतरता या सर्व गोष्टी जर आज आटोक्यात आणल्या नाहीत तर पुढे जाऊन सर्वच जीवसृष्टी धोक्यात येईल. नाहीशी होत जाणारी जंगले यामुळे आज प्राण्यांच्या अस्तित्वावरही परिणाम होत आहे. त्यांचा निवाराच तुम्ही माणसांनी संपवून टाकला आहे. स्वतःच्या फायद्यासाठी माणूस स्वतःचेच नुकसान करत आहे, हे तुमच्या लक्षातच येत नाहीये. दरवर्षी उन्हाळा सुरु झाला कि तुम्हाला पाणीटंचाई जाणवते. झाडेच नसतील तर पुरेसा पाऊस कसा येणार? नुकतंच मी या बागेत कोणालातरी बोलताना ऐकलं कि केप टाऊन नावाच्या शहरातला सगळा पाणीसाठा संपलाय. ऐकून धक्काच बसला मला.
विकासात्मक कामासाठी रस्ते रुंद करणे अपरिहार्य आहे आणि ही कामे करताना आमचे असंख्य भाऊ-बंध तोडले गेले आहेत, तोडले जात आहेत. शहरी भागात वटपूजनासाठी झाडाजवळ जाण्याऐवजी आजच्या कार्यमग्न महिला बाजारातून एखादी वडाची फांदी विकत घेतात आणि त्याची पूजा करून दुसऱ्या दिवशी ती फांदी फेकून देतात, ही तर या झाडाची विटंबना आहे, पूजा नव्हे !
यामुळे असंख्य चांगल्या वडाच्या झाडांच्या फांद्यांची छाटणी वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी झालेली आपल्याला दिसते, यामुळे या अक्षय वृक्षाला आपण ग्रहण लावत आहोत. आधीच संख्येने कमी असलेले वटवृक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. निसर्ग जे आपल्याला भरभरून देतो, त्याची परतफेड आपल्याला करायला नको का? हे जर असंच सुरु राहील तर एक दिवस सगळ्या जगातला पाणीसाठा संपेल, नद्या आटतील, पशु पक्षी माणसे तुम्हा आम्हा सगळ्यांचाच अस्तित्व धोक्यात येईल. आज तुमच्यातील काही जणांना याची जाणीव झाली आहे. झाडे लावा, झाडे जगवा हि मोहीम आज जोरात सुरु आहे. परंतु ज्या प्रमाणात तुम्ही झाडांची कत्तल केली आहे त्या प्रमाणात झाडे लावली जात नाहीत. तेव्हा वेळीच सावध व्हा.
Explanation:
Happy Republic Day Dear