Art, asked by poojadhumal87424, 4 days ago

मी पाऊस बोलतोय मराठी निबंध​

Answers

Answered by pdhengare4
0

Answer:

वासाचा पयला, पाऊस अयला

नभाचे घुम्मड, मातीये भारीला

हे कवी अशोक बागवे यांचे पाऊसभरले गीत रेडिओवर चालू होते. दाही दिशांमध्ये पावसाचा माहोल उभा राहिला होता. सर्व शब्द पावसात चिंब भिजले होते. आसमंतातल्या कणाकणात मातीचा गंध भरून राहिला होता. पावसाने हे गीत ऐकले आणि तो स्वतःच व्याकूळ झाला… त्याच्या मनातली माणसाविषयीची भावना जागी झाली. त्याच्या सद्गदित कंठातून शब्द उमटू लागले… “किती मृदुल स्वर! माणसाने मला स्वत:च्या हृदयात किती खोल खोल रुजवून घेतले आहे! काही वेळा माणूस निसर्गाची नासधूस करतो. त्यामुळे निसर्गाच्या मूळ रूपाला धक्का लागेल की काय, अशी भीती वाटू लागते आणि त्याबद्दल त्याचा मला रागही येतो अनेकदा.

‘पण खरे सांगू का? माणूस अंतर्यामी कोमलच आहे. माझ्या सहवासात तो हळुवार, मृदुल बनत जातो. माझ्या विभ्रमांनी त्याच्या हृदयाच्या तारा छेडल्या जातात. मग मी त्याच्यासाठी साऱ्या सृष्टीलाच हिरवेगार सुख लपेटून देतो. त्या दर्शनाने तो हरखून जातो. त्या वेळचे त्याचे ते रूप लोभसवाणे असते. म्हणूनच त्याला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या रूपांत भेटणे हा माझा छंदच झाला आहे. वर्षातून सलग तीन-चार महिने मी त्याला भेटतो; मध्येच केव्हा तरी लहर आली, तर जातोसुद्धा. मात्र माझ्या विश्रांतीच्या काळात आपल्या विविध कामांत गुंतलेला माणूस मे महिना संपताच माझी आतुरतेने वाट पाहू लागतो. जरा उशीर झाला, तर बेचैन होतो. त्याला कधी एकदा भेटतो, असे माझेसुद्धा होऊन जाते. मग मी ढगांना गोळा करतो. त्यांच्यावर स्वार होतो आणि वायूच्या वेगाने दौड करीत माणसाच्या भेटीला निघतो.

“काय सोहळा वर्णावा तो! आभाळभर ढगच ढग असतात. सूर्य झाकला जातो. भर दिवसा सगळीकडे काळोख पसरतो. वारा दांडगट मुलांप्रमाणे हुंदडू लागतो. आणि काही क्षणांतच टपोऱ्या थेंबांच्या रूपात ताडताड वर्षाव करीत मी धुवाधार कोसळू लागतो. जरासुद्धा थांबण्याची माझी इच्छा नसते. आभाळभर मीच असतो. फक्त मी! घराशेजारी, रस्त्यावर, शेतात, डोंगरावर, दरीमध्ये सर्वत्र माझाच धो धो संचार असतो. माझ्याबरोबर सर्व मुलेसुद्धा मनसोक्त नाचू लागतात. मी त्यांना माझ्यात भिजवून टाकतो आणि ती मुले मला त्यांच्या उत्साहात चिंब करतात. खर तर दोघेही एकरूप होऊन एकमेकांसोबत उत्फुल्लतेने नाचत असतो. माणसाला मी एवढा आवडतो की, त्याने माझ्या या भेटीच्या काळाला ‘पावसाळा’ असे नावच दिले आहे !

“हे असेच धबाबा कोसळत राहण्याचा कधी कधी कंटाळाही येतो. मग मी अलगद रिमझिमत अवतरतो. माझ्या मृदुमुलायम स्पर्शाने तो माणूस स्वत:च मृदुमुलायम बनतो. माझा आडदांडपणा गायब झाल्यामुळे सूर्यकिरणे मला पकडायना धावतात, मीसुद्धा त्यांच्याशी पकडापकडी खेळायला सुरुवात करतो. पकडापकडी खेळता खेळता आम्ही दोघेही एकमेकात कधी मिसळून जातो, कळतच नाही. माझ्या थेंबाथेंबात सूर्यकिरणे विरघळतात आणि स्वत:चा भगभगीतपणा घालवून स्वतःच अलवार बनतात. मीसुद्धा चमचमते प्रकाशबिंदू अंगांगावर लेवून विहरत राहतो. पृथ्वीवर अलवार प्रकाशबिंदूंचा जणू वर्षातच होऊ लागतो. त्या प्रकाशबिदूना स्वप्न पडते. ते स्वप्नभरले डोळे उघडतात आणि कोमल सप्तरंगांचे इंद्रधनुष्य अवकाशात तरळू लागते.

“कधी कधी माणूस नतद्रष्टासारखा वागतो. त्याने वेगवेगळ्या प्रकारचे इतके प्रदूषण माजवले आहे की, मीसुद्धा हतबल होतो. माझा देह शुष्क बनतो. देहात पाण्याचे थेंब नसतात. सगळे त्राणच निघून जातात. मी माझे ढग घेऊन सर्वत्र । जाण्याचा प्रयत्न करतो; पण थोडेसुद्धा थेंब बरसू शकत नाही. जमीन कोरडीठाक पडते. तिला भेगा पडतात. तिने फोडलेला टाहो मला ऐकू येतो. पण मी काहीही करू शकत नाही. लोक म्हणतात-दुष्काळ पडला! “कधी कधी याच्या उलट घडते. प्रदूषणामुळे तापमानात प्रचंड उलथापालथ होते. माझा आहार बिघडतो. समतोलपणा नाहीसा होतो. ढगात पाणी तुडुंब भरते. मी स्वत:लाच सावरू शकत नाही. कुठेतरी तोल जातो. त्यामुळे मी धबाधबा कोसळतो. नदयांना पूर येतो. गावेच्या गावे वाहून जातात. इथेही माझा इलाज नसतो. ढगफुटी, ढगफुटी असा एकच कोलाहल माजतो! माणसाने अजूनही वागणूक सुधारली, तर त्याची माझी सुंदर मैत्री चिरकाल टिकेल!

Similar questions