India Languages, asked by snrajput53, 6 months ago

majhya deshasathi me kay karnar marathi nibandha​

Answers

Answered by pandiyapalak1137
0

Explanation:

स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक व्याख्यांचं स्वरूप बदलायला लागलं. रोज सकाळी प्रार्थना नंतर तास सुरू होत असत. परत शाळा सुटताना शेवटची प्रार्थना, वंदे मातरम् असायचे. यातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती, मोठ्या लोकांचा आदर यांसारख्या गोष्टी शिकायला मिळायच्या. यातील बऱ्याच गोष्टी सध्या लुप्त झाल्या आहेत. म्हणूनच स्वतःला विचारा, मी या देशासाठी काय करतो?

देशाला स्वातंत्र्य मिळूनही ७० वर्षे झाली तरीही आपण अजून विकसनशील देशांच्या यादीतच आहोत. याची अनेक कारणे आहेत. आपण साधे देशातील नियम पाळू शकत नाही. नियम मोडणे हेच आपल्याला स्वातंत्र्य वाटते. इतर विकसित देशांची तुलना करता, त्यांचे लष्करी सामर्थ्य, पैसा, पायाभूत सुविधा याचा आपण विचार करतो. पण, त्या देशातील लोकांची मानसिकता आपण जाणून घेत नाही. ते वाहतुकीचे नियम पाळतात, ते नियम मोडणाऱ्याला, मग तो पुढारी असो वा सेलिब्रिटी असो त्याला शिक्षा होते. ते न चुकता कर भरतात. सार्वजनिक ठिकाणी थुंकत नाहीत. स्थानिक प्रशासनाने जी चौकट घातली आहे, ती त्यांना बंधन वाटत नाही. आपण मात्र अगदी याच्या उलटे वागतो. ‘येथे शांतता राखा’ असे लिहिले असेल, तिथे हमखास कलकलाट असतो. ’येथे थुंकू नये’ असे लिहिलेल्या पाटीवरच लाल पिचकार्‍यांची रांगोळी असते. ‘नो पार्किंग’ची पाटी असते, तिथेच गाड्या आडव्या-तिडव्या लावलेल्या असतात. ‘कृपया रांगेची शिस्त पाळा’ असे लिहिलेल्या ठिकाणीच झुंबड असते. येथे ‘स्वच्छता राखा’ असे लिहिलेल्या पाटीखालीच कचऱ्याचा डोंगर असतो. एक ना अनेक, म्हणजे ‘नियम हे मोडण्यासाठीच असतात,’ अशी आपली धारणा असते. आजकाल अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे देशातील सगळ्यात मोठे स्वातंत्र्य असल्याचा समज समाजमाध्यमांनी पसरविला आहे आणि हे स्वातंत्र्य दाबले जाते आहे म्हणून आरडाओरडही केली जाते. गेल्या चार-पाच वर्षांत वर्तमानपत्रांमध्ये एखादा विषय जितका चर्चिला जात नाही, तितका टीव्ही चॅनेल्स आणि या समाजमाध्यमांमध्ये चर्चिला जात आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप अशा माध्यमांतून एक मोठा वर्ग व्यक्त होत आहे. यात विषयांचे बंधन नाही. दहशतवादी बुर्‍हान वाणीपासून ते एखादा चित्रपट सेन्सॉरने संमत करावा की नाही, इथपर्यंत. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मी काहीही लिहू शकतो, बोलू शकतो, याला जर कुणी अटकाव करण्याचा प्रयत्न केला, तर आहेच पुढे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आल्याची ओरड. या सगळ्यात आजची तरुणाई काही वेगळा विचार करते आहे का? देशावर त्यांचे प्रेम आहे, पण ते फक्त स्वातंत्र्य दिन किंवा २६ जानेवारीलाच उफाळून येते. एरव्ही ‘मी, माझे करिअर, माझी नोकरी, माझी प्रेयसी’ यातच ही तरुणाई बुडालेली असते. म्हणूनच प्रत्येकाने विचार केला पाहिजे की, ‘मी या देशासाठी काय करतो?’

जबाबदार नागरिक

भारतीय घटनेने प्रत्येक भारतीयाला जसे अधिकार दिले आहेत, तशीच काही कर्तव्येसुद्धा दिली आहेत. बऱ्याच वेळेला या कर्तव्यांकडे नागरिक दुर्लक्ष करतात. सार्वजनिक मालमत्ता ही आपली आहे, तिची जपणूक करणे हीसुद्धा आपलीच जबाबदारी आहे, याचा नागरिकांना सपशेल विसर पडतो. परिसर स्वच्छ ठेवणे हीदेखील आपली जबाबदारी आहे. पण, कचरा सर्रास रस्त्यावर, स्टेशनवर आपण टाकतो. पान खाऊन चहूकडे थुंकणे तर काहींचा जणू छंदच... आपण इतके बेजबाबदार आहोत की, काही झाले की लगेच या सगळ्यांसाठी राजकीय नेतेच जबाबदार आहेत, असे म्हणून त्यातून अंग काढण्याचा प्रयत्न करतो. राजकारण्यांना प्रश्न विचारण्यापूर्वी प्रत्येक नागरिकाने आत्मपरीक्षण करण्याची आज खरी गरज आहे. नाले, गटार हे सांडपाणी वाहून नेण्यासाठी असतात, कचरा टाकण्यासाठी नाही. तरीही नाल्यांना डम्पिंग ग्राऊंडचे रूप आलेले दिसते. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा टाकावा, अशा सूचना वारंवार पालिकेकडून दिल्या जातात. तरीही हा नियम लोकांनी अक्षरश: पायदळी तुडवला. वाहतुकीचे नियम जितके आपल्याकडे मोडले जात असतील, तितके क्वचितच इतरत्र मोडले जात असतील. अस्ताव्यस्त पार्किंग करणे, ओव्हरटेक करणे या गोष्टी अगदी छातीठोकपणे आपल्याकडे केल्या जातात. नियम मोडण्यात सुशिक्षित-अशिक्षित दोघेही आघाडीवर. शिकून माणूस सुशिक्षित होतो, पण सुसंस्कृत होत नाही. त्यामुळे नियम पाळण्यासाठी गरज कडक कायद्याची नाही, तर गरज आहे सद्सद्विवेकबुद्धीची. पालकांनी नियम पाळण्याची आणि मुलांवर उत्तम नागरी संस्कार करण्याची.

पोलिसांचे कान डोळे व बनले पाहिजे

आपापलं काम व्यवस्थित करणं हीच देशभक्ती

सिग्नल पाळणं ही देशभक्ती आहे, रस्त्यावर न थुंकणं ही देशभक्ती आहे. स्त्रियांचा आदर करणं ही देशभक्ती आहे, दिलेला शब्द पाळणं ही देशभक्ती आहे. दिलेली वेळ पाळणं ही देशभक्ती आहे. भ्रष्टाचारास उत्तेजन न देणं ही देशभक्ती आहे. लाच न देणं ही देशभक्ती आहे. सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवणं ही देशभक्ती आहे. आपल्याआधी लोकांचा विचार, ही देशभक्ती आहे. रस्त्यावरील वाहतूक अडवून लग्नाच्या मिरवणुकीत न नाचणं ही देशभक्ती आहे. चूक मान्य करणं ही देशभक्ती आहे. जात आणि प्रांतीयवादाचा पुरस्कार न करणं ही देशभक्ती आहे. सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणं ही देशभक्ती आहे. मतदान करणं ही देशभक्ती आहे. योग्य उमेदवार निवडणं ही देशभक्ती आहे. स्वत:च्या क्षेत्रामध्ये वैध मार्गानं यशस्वी होणं ही देशभक्ती आहे. वाद न घालता काम करणं ही देशभक्ती आहे. जागा मिळेल तिथं मलमूत्र विसर्जन न करणं ही देशभक्ती आहे. इतिहासापासून शिकणं ही देशभक्ती आहे. गतकालातील गोष्टींवर वाद न घालणं ही देशभक्ती आहे, स्वत:च्या कर्तव्यांप्रती जागरूक असणं ही देशभक्ती आहे. महाराज-बाबा-नेते-अभिनेते-कार्यकर्ते-पक्ष-धर्म-विचारसरणी अशा कोणाचेही स्तोम न माजवणं ही देशभक्ती आहे. चांगल्या कामात कोलदांडा न घालणं ही देशभक्ती आहे, स्वत:पलीकडे पाहणं ही देशभक्ती आहे आणि सुप्रयत्न करणं ही देशभक्तीच आहे. ज्या देशामधील नागरिक देशाचे नागरिक म्हणून घेण्यास पात्र असतात, त्या देशाला प्रगती करण्यासाठी वेगळा प्रयत्न करण्याची गरज नसते.

Similar questions