Art, asked by indradhaware42590, 1 year ago

marathi vaicharik nibandh​

Answers

Answered by vishalram51
1

Answer:

निबंध : आधुनिक गद्यलेखनाचा एक प्रकार. ‘निबंध’ या संस्कृत शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यांपैकी ‘एकत्र बांधणे’ किंवा ‘रचणे’ हे अर्थ या लेखनप्रकाराशी अधिक जुळतेमिळते आहेत. एकेकाळी भूर्जपत्रांवर लेखन केले जाई व अशी भूर्जपत्रे एकत्र करून बांधत. लक्षणेने एखाद्या विषयासंबंधी संगतवार रचलेले वा उभारलेले मध्यम व्याप्तीचे लेखन म्हणजे निबंध, असे म्हणता येईल. अगदी छोटे गद्यलेखन टीपा, टिप्पणी किंवा टिपण म्हणता येईल. अगदी मोठे लेखन व्याप्तीलेख, प्रबंध वा ग्रंथही म्हणता येईल. व्याप्तीदृष्ट्या या दोहोंच्या मध्ये कुठेतरी निबंध हा प्रकार बसू शकेल. एखाद्या विषयासंबंधी प्रतिपाद्य समाधानकारकपणे कसे मांडता येईल, यावर लेखनाची व्याप्ती अवलंबून असते. त्यामुळे टिपा-टिपाणे आणि प्रबंध-ग्रंथ या दोहोंमध्ये कुठेतरी बसणाऱ्या निबंधलेखनातही ठराविक व्याप्ती आढळत नाही. काही निबंध लहान, तर काही दीर्घ असू शकतात. लेखनामागील उद्दिष्टही त्याची व्याप्ती तसेच ठेवण या घटकांवर परिणाम करतेच. टीपा-टिपणे, निबंध, प्रबंध, ग्रंथ यांसारख्या प्रत्येक लेखनप्रकाराचा घाट लेखनविषयक भूमिकेवर अवलंबून असतो.

निबंधसाहित्यात निबंधकाराच्या व्यक्तिमत्त्वालाही अर्थातच महत्त्व असते. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा त्याने निवडलेले विषय, त्यांची केलेली मांडणी आणि त्याची भाषाशैली यांवर उमटलेला असतो. याचा अर्थ निबंध हा प्रकृतीने वस्तुनिष्ठ लेखनप्रकार असला,तरी त्यात लेखकाच्या आत्मनिष्ठेचे दर्शन सूचकपणे घडतेच. शैलीसारख्या किंबहुना निबंधातून सूचित झालेल्या मतांसारख्या गोष्टींवरून हे दर्शन घडते. कोणतेही लेखन हे पूर्णपणे वस्तुनिष्ठ असणे अशक्य आहे. अगदी ऐतिहासिक वा वैज्ञानिक विषयांवरील लेखनही, अल्प प्रमाणात का होईना, लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचे निदर्शक ठरते.

आधुनिक निबंधसाहित्य हे गद्यातच असते. तथापि गद्यसाहित्याचा उदय होण्यापूर्वी सगळेच लेखन पद्यातून होत असे. आपल्याकडे महाभारतातील राजधर्मासारखे (शांतिपर्व) प्रकरण हे पद्यातील निबंधसाहित्य म्हणता येईल. रामदासांनी लिहिलेली काही प्रकरणे – उदा., राजधर्म, सेवकधर्म – यांचे स्वरूप स्थूलमानाने निबंधवजाच म्हणता येईल. इंग्रजीत अठराव्या शतकात अलेक्झांडर पोप या कवीने ‘ॲन एसे ऑन क्रिटिसिझम’ व ‘ॲन एसे ऑन मॅन’ या नावांच्या कविताच लिहिलेल्या आहेत व त्यांत विचारप्रर्वतनालाच महत्त्व आहे. तेव्हा गद्य आणि पद्य ही माध्यमे निबंधाच्या हेतूशी संवादी असली, तरी प्रत्यक्षात मात्र निबंध साहित्यप्रकाराचा सोळाव्या शतकानंतरचा जो इतिहास आहे, तो गद्यातील निबंधासंबंधीचाच आहे.

निबंधसाहित्याचा उदय पश्चिमेकडे सोळाव्या शतकाच्या अखेरीस झाला. आधुनिक भारतीय भाषांत इंग्रजी भाषासाहित्याच्या परिचयाने एकोणिसाव्या शतकात हा प्रकार रुजला. ज्या परिस्थितीत निबंधप्रकार उदयास आला, तिचा विचार करून काही विचारवंतांनी निबंधसाहित्यामागील जीवनविषयक प्रवृत्ति-प्रेरणांचा दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न केला आहे. धार्मिक श्रद्धेने किंवा अंधश्रद्धेने एखादा विषय प्रतिपादन करण्याऐवजी बुद्धीवादाने, तर्कशुद्ध रीतीने, शास्त्रीय पद्धतीने व लौकिक भूमिकेने त्या विषयाचा मागोवा घेणे ही आधुनिक दृष्टी निबंधसाहित्यामध्ये असते, असे म्हटले जाते. शब्दप्रामाण्याऐवजी बुद्धिप्रामाण्य, समाजाबरोबर व्यक्तीचे मूल्य पारमार्थिक निष्ठेऐवजी इहलोकनिष्ठा यांचा पुरस्कार करण्याची प्रवृत्ती निबंधसाहित्याच्या मुळाशी आहे, असे म्हटले जाते. याचे प्रत्यंतर आधुनिक भारतीय भाषांतील निबंधसाहित्यावरून येऊ शकते. प्रबोधनाचे सगळे प्रश्नोपप्रश्न भारतीय निबंधकारांनी आपल्या निबंधातून हाताळलेले आहेत. त्यामागे एक आधुनिक दृष्टीकोन आहे. मराठीतील लोकहितवादी, जोतिबा फुले, विष्णुशास्त्री चिपळूणकर, लो. टिळक, गो. ग. आगरकर, शि. म. परांजपे, वि. का. राजवाडे, न. चि. केळकर, वि. दा. सावरकर, शं. दा.जावडेकर, श्री. म. माटे, द. के. केळकर, पु. ग. सहस्रबुद्धे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी इत्यादींचे निबंधसाहित्य पाहिले, की त्यामागील इहलोकनिष्ठा, बुद्धिप्रामाण्य, विज्ञाननिष्ठा, तार्किक सुसंगती, व्यक्तिवाद तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता यांसारखी आधुनिक जीवनमूल्ये यांचे अधिष्ठान लक्षात येते.

Similar questions