CBSE BOARD X, asked by hrutuparn, 11 months ago

zadache atmavrutta nibandh in Marathi

Answers

Answered by sohamshelke
1276
मी एक झाड बोलतोय. मी आज तुमच्या समोर माझे मनोगत व्यक्त करणार आहे. सद्ध्याच्या आधुनिक आणि तंत्रज्ञान प्रिय जगात तुम्ही मला विसरला आहात. मी तुम्हाला आज माझे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
माझ्यामुळेच तुम्हाला जीवनावश्यक ऑक्सिजन मिळतो, ऑक्सिजन ज्याच्या शिवाय मानव ५ मिनिटापेक्षा जास्त जगू हि शकत नाही. मी जर ऑक्सिजन निर्माण नाही केला तर तुम्ही श्वास कसा घ्याल, निसर्गाचा ऱ्हास करून बनवलेल्या घरात कसे राहाल? जंगले तोडून बांधलेल्या रस्त्यांवर प्रवास कसा कराल? जर झाडे नसतील तर या पृथ्वीवरचे जीवनाचं नष्ट होईल. हे सारे समजायला किती सोपे आहे. पण तरीही तुम्ही का वृक्षतोड करता? का वणवे पेटवता?
माझ्या अंगाखांद्यावर पशू पक्षी खेळतात. किती पक्षी तर आपली घरटी माझ्या फांद्यांवर मांडतात. तुम्ही त्यांचे घर तोडून टाकता आणि आपले घर बांधता आणि मग एखादा बिबट्या, हत्ती घरात, शेतात शिरला तर, आरडाओरड करता? त्याला तुम्ही पळवून पळवून मारून टाकता. तुम्ही पशू पक्षांचे घर तोडता, जाळता मग त्यांनी तुम्हाला मारले तर चालेल का?
सहलीला जाताना एखाद्या मोठ्या वडाच्या झाडाखाली बसून वन भोजन करणे कोणाला आवडत नाही . पण रस्ते रुंदीकरणासाठी तुम्ही अशीच झाडे तोडत राहिलात तर असे अनुभव तुम्ही कसे घेऊ शकाल. वडाच्या पारंब्याना लटकणे, चोरून आंबे पाडणे, मोठ्या झाडाच्या फांदीला झूला झूलने; या साऱ्या आठवणीनी तुमचे बालपण सजले होते. पण ज्या प्रकारे वृक्षतोड होत आहे, पुढच्या पिढीला हे अनुभव कधीच अनुभवता येणार नाहीत आणि मग तुम्ही तक्रार करता कि आमची मुले दिवस रात्र विडिओ गेम्स खेळत बसतात.


तुमच्या सारखे आम्ही सुद्धा जिवंत आहोत, आम्हाला ही भावना आहेत, आम्हाला ही वेदना होतात. तुमच्या मुलांना, प्रियजनांना थोडेसे खरचटले की तुमच्या मनाची घालमेल होते. पण झाडाच्या फांद्या तोडताना, फळांसाठी दगड मारताना, करवतीने, कुऱ्हाडीने वृक्षांना कापताना तुम्हाला काहीच कसे वाटत नाही? डोळ्यात अश्रू नाही पण मनात एक साधा विचार ही येत नाही, एवढे अमानुष कसे झालात तुम्ही?
झाडाझुडपांमुळे जमिनीची धूप कमी होते. झाडांची मुळे माती धरून ठेवतात, याने जमिनीचा पोत टिकून राहतो. यामुळे कमीत कमी कृत्रिम, रासायनिक खतांच्या मदतीने चांगले पीक घेता येते. जर चांगली पिके आली तर गरीब शेतकऱ्याला मोठे कर्ज काढावे लागणार नाही, त्याला आत्महत्या करावी लागणार नाही.
आदिवासी, गावातील गरीब लोक जंगलातून फळे, फुले (रानमेवा) आणून विकतात. त्यांच्यावर त्यांचे पोट भरते. झाडे तोडून,वणवे लावून तुम्ही त्यांच्या पोटावर पाय ठेवत आहात. तुम्ही जंगलात वणवे लावता, हजारो छोटे मोठे प्राणी, पक्षीमारले जातात, त्यांना स्थलांतर करावे लागते. जर तुमचे घर कोणी विनाकारण पेटवून दिले तर तुम्हाला कसे वाटेल? या सर्वामुळे नकळत तुम्ही मानवी जीवन चक्र प्रभावित करत आहात. तुम्ही स्वतःच्या हातांनी आपला विनाश लिहत आहात.
अजूनही वेळ गेली नाही, तुम्ही खूप झाडे तोडली आहेत, पर्यावरणाचा खूप ऱ्हास केला आहे. अजूनही तुम्ही केलेली चूक सुधारण्याची संधी आहे. आणखी एखादं दशक असेच चालू राहिले तर काहीच करता येणार नाही. आज जसे आपण बाटलीतून पाणी पितो तसे भविष्यात बाटलीतून श्वास घ्यावा लागेल. आपल्या नंतरची पिढी राजनीती आणि धर्मासाठी न लढता, पाणी आणि ऑक्सिजन साठी एकमेकांचा जीव घेईल. तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला हाच वारसा द्यायचा आहे का?
मी कोणामध्येही भेदभाव करत नाही. माझ्यासाठी पशू, पक्षी, मानव सारे एक सारखे आहेत. मी जात, धर्म, रंग असा भेदभाव करत नाही, मला सगळेच प्रिय आहेत. तुम्ही पण असे सगळे भेदभाव विसरून एकत्र या आणि या सुंदर पर्यावरणाला वाचवा. नाहीतर उद्या मनुष्यच नसतील तर तुम्ही जात, धर्म, रंग, राज्य, भाषा, देश यांचे काय कराल. वृक्ष सुद्धा तुमच्या सारखेच सजीव आहेत, त्यांचे संगोपन करा, काळजी घ्या.
माझे हे मनोगत ऐका आणि प्रत्येकानी एक नाही चार चार झाडे लावा. वाढदिवसात, लग्नात इतर भेटवस्तू देण्याऐवजी झाडाचे रोपटे भेट म्हणून द्या. मोकळ्या जागेत, डोंगर उतारावर झाडे लावा. फक्त आपल्या जमिनीवरील नाही तर दुसऱ्याच्या झाडांनाही पाणी घाला. पशूंपासून त्यांची रक्षा करा. वणवा लावून देऊ नका. तुम्ही निसर्गाचा आदर करा,निसर्ग तुमचे संगोपन करेल. निसर्ग खूप बलाढ्य आहे, तो खूप सहनशील आहे, पण त्याच्या संयमाचा अंत पाहू नका, हीच विनंती. सर्वात शेवटी मी एकच मंत्र देईल, “झाडे लावा झाडे जगवा“.
Answered by shivamsg7667
0

Answer:

मी एक झाड बोलतोय. मी आकाराने खूप मोठा आहे आणि मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी देखील आहे, माझे नेहमी आनंदी राहण्यामागील कारण असे आहे की मी लोकांना खूप लाभ पोहोचवतो. मी मनुष्याला ऑक्सिजन प्रदान करतो आणि स्वतः कार्बन डायऑक्साइड ग्रहण करतो पण तरीही कधी कधी लोक माझ्याशी छेडछाड करतात. मी शांतपणे रस्त्याच्या एका बाजूला उभा असतो, जाणारे येणारे लोक नेहमी माझ्या सावलीत विसावा घेत बसतात.

उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा घामाने शरीर थकते तेव्हा लोक माझ्या सावलीत येऊन बसतात. माझ्या सावलीत बसून त्यांना आनंद मिळतो, यासाठी ते मला धन्यवाद देखील करतात. लोकांचा धन्यवाद ऐकुन मला खूप बरे वाटते. पण दुसरी कडे असाही विचार करत बसतो की, काही लोक विनाकारण माझ्या फांद्या आणि पाने तोडत असतात. काही लोक आपल्या लहानश्या स्वार्थासाठी मला नष्ट करून टाकतात. मी आज खूप मोठा होऊन गेलो आहे ज्यामुळे कोणताही मनुष्य किंवा प्राणी मला सहज नुकसान पोहचू शकत नाही.

बरेच लोक रस्त्याच्या कडेला मला पाहून माझी प्रशंसा करतात. ते म्हणतात की किती मस्त झाड आहे. काही लोक माझे फळ खाऊन त्यांची प्रशंसा करतात. काही प्राणी माझे खाली लोंबकलेल्या फांद्यांची पाने खातात, तेदेखील माझ्यासाठी चांगली प्रार्थना करतात. मी वातावरणाला प्रदूषित होण्यापासून वाचवतो. माझ्या मुळांमधील मातीला घट्ट धरून ठेवतो. माझे वय खूप जास्त असते, मी हजारो वर्षांपर्यंत एका उभा जागी राहू शकतो. परंतु मला या गोष्टीची बऱ्याचदा भीतीही वाटते. मला वाटते की जर कधी एखादा मनुष्य येऊन मला कापून घेऊन गेला तर? हा विचार करूनच माझ्या अंगावर शहारे येतात. मला नेहमी या एका गोष्टीचीच चिंता सतावत असते. कारण आजही जगात असे अनेक मनुष्य आहेत जे स्वतः च्या स्वार्थासाठी झाडांना कापून टाकतात. ते या गोष्टीचा कधीही विचार करीत नाही की मी त्यांच्यासाठी किती उपयुक्त आहे. मला नुकसान पोहचवणे म्हणजे निसर्गाला नुकसान पोहचवणे होय.

माझ्यामदतीने अनेक लोक आपली उपजीविका भागवतात. काही लोकांचे व्यवसाय ही माझ्या मुळेच सुरू आहेत. लोक माझ्या फळांना तोडून बाजारात विक्रीसाठी नेतात आणि त्यांना विकून आपला व्यवसाय चालवतात. माझ्या शरीराचा प्रत्येक भाग काही न काही कामात येतो. पक्षी माझ्या दाट फांद्यांमध्ये आपली घरटी करतात. हे पक्षी देखील माझी पाने तोडतात पण मी कोणालाच काही बोलत नाही.

प्रत्येक जीवजंतू माझा उपयोग करून घेतो. पण तरीही मी प्रतिक्रिया न करता सर्व काही सहन करीत राहतो. आणि जोपर्यंत या पृथ्वीवर माझे अस्तित्व आहे तोपर्यंत मी मनुष्य आणि इतर प्राण्याची अशाच पद्धतीने सेवा करीत राहील, जरी काही लोक मला नष्ट करून माझी लाकडे विक्रीसाठी नेत राहतील तरी मी माझे सेवा कार्य अखंड सुरू ठेवील.

Similar questions